Friday 28 December 2012

तरच रोखले जाऊ शकतात बलात्कार!


काही वर्षांपूर्वी संघाची शाखा कार्यवाह अशी जबाबदारी होती. बालांची शाखा होती आमची. बाल शाखा म्हणजे अगदी पहिलीत जाणार्‍या मुलांपासून मुलं यायची. तेव्हाचा एक किस्सा आठवतोय.

शाखा सुटल्यावर सगळ्या बालांसोबत गप्पा, मस्ती करत आम्ही घराकडे परतत होतो. वाटेत दोन मुली घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या आमच्याकडे आल्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘काही मुलं सायकलवरून फिरत आहेत. अंधारात मुली एकट्या दिसल्या की त्यांच्या अंगाला हात लावून पळून जातात. प्लिज आम्हाला मदत करा.’’

आम्ही तरुणांनी आमच्या बहिणींना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत सोडलं. त्यानंतर काही दिवस त्या रस्त्यांवर पहारा करणं, अशा गुंडांचा शोध घेण हा आमच्या शाखेचा उपक्रम झालेला.

दिल्लीत काही दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्कार झाला. आज सिंगापूरला रुग्णालयात त्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली आहे. त्या बलात्कारानंतर बरेच तरुण हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले. मीडियाने या निदर्शनांना सर्वतोपरी प्रसिद्धी दिली. त्यांचा त्यातच धंदा आहे, हे जरी खरं असलं तरी अशा गोष्टींना सर्वतोपरी प्रसिद्धी देऊन त्यांनी चांगल्या गोष्टीच्या मागे आम्ही उभे आहोत हेच दाखवून दिलंय, असं माझं मत आहे. प्रसिद्धीच्या झोतात अनेक चुकीच्या गोष्टीही घडल्याच! पण त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही.

इथे मुद्दा हा येतो की आपले तरुण निदर्शन करायला रस्त्यावर उतरू लागले आहेत. या निदर्शनांच्या दरम्यान दिल्ली किती असुरक्षित आहे याचीसुद्धा सवंग चर्चा झाली. पुढे ही चर्चा दिल्लीच असुरक्षित नाही, तर सारा देश स्त्रियांच्या दृष्टीने किती असुरक्षित आहे, हेही समोर आलं.

एक प्रश्‍न येथे उपस्थित करावासा वाटतो, तरुण निदर्शन करायला बाहेर पडू लागले आहेत, तर संरक्षणाला का नाही? निदर्शन करणं ही प्रतिक्रीया आहे. प्रतिक्रिया देण्यासाठी एखादी दुर्घटना होण्याची वाट का पाहावी?सुरुवातीच्या किस्स्यामध्ये संघाचा उल्लेख केलाय तो संघकामाची जाहिरात करण्यासाठी नाही. अशा प्रकारचा अनुभव समाजात पुरुषार्थ जागृत करणार्‍या अनेक संस्था/संघटनांना आला असेलच. अगदी कॉंग्रेसच्या सेवा दलाला अथवा कम्युनिस्टांनासुद्धा. जसे संघाचे स्वयंसेवक म्हणून आम्ही कृती केली तशीच कृती या संघटनाही करतील, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपले तरुण फक्त निदर्शनांसाठी बाहेर पडत आहेत. अशा विधायक कामांसाठी बाहेर पडून, अशा विधायक कामांना नित्यनेमाने वेळ देऊन बलात्कारासारख्या घटना या समाजात होणारच नाहीत, असा समाज निर्माण करण्यासाठी ते बाहेत पडतील तेव्हाच हे रोखले जाईल. कृपया विचार करा...

Wednesday 22 August 2012

राज ठाकरे यांची सभा : ‘मियॉं की दौड मज्जीद तक’


राज ठाकरे यांची सभा : ‘मियॉं की दौड मज्जीद तक’

- शैलेश राजपूत


कालची राज ठाकरे यांची आझाद मैदानावरील सभा पाहिली की असंच म्हणावसं वाटतं की ‘मियॉं की दौड मज्जीद तक’! आसाम आणि म्यानमार येथे मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी लाखांच्या घरांत मुसलमानांचा जमाव गोळा झाला. तिथे झालेल्या सभेनंतर जमावाने हैदोस घालण्यास सुरुवात केली. पोलीस व माध्यमांना लक्ष्य केले. त्यात महिला पोलिसांववरही अत्याचार झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीकर राज यांचा कालचा मोर्चा आणि सभा होती, पण या सभेत राज यांनी मुजोर झालेल्या या आतंकी प्रकृत्तीवर बोलण्याची हिम्मतच केली नाही. त्यांनी केवळ गृहमंत्री व मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर शरसंधान करून आपली पॉप्युलॅरीटी कायम ठेकली. या वेळी राज केवळ ‘पॉलिटीकली करेक्ट’ होते.

कालच्या मोर्चाच्या विषयात दोन दिवस आधीपासूनच माध्यमांमध्ये ‘राज ठाकरे ‘हिंदुत्व कार्ड’ खेळणार का?’ याबाबत चर्चा होती. मोर्चाच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राज ठाकरें यांना हे प्रश्‍न विचारले गेले. मात्र राज यांनी आपले धोरण आपण उद्याच्या सभेत स्पष्ट करू, असे सांगून सर्वांना तंगवत ठेकले. मनसेच्या आमदारांना काल मोर्चादरम्यान पत्रकारांनी ‘हिंदुत्वा’बाबत प्रश्‍न विचारता ते अंगाकर पाल पडल्यासारखे विषय झटकत होते. त्याचप्रमाणे राज यांनीही सभेत आपण कोणत्याही एका धर्मापुरते नसून आपल्याला ‘महाराष्ट्र धर्म’ कळतो, असे म्हणाले. राज यांचा महाराष्ट्र धर्म आणि समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ‘महाराष्ट्र धर्मा’ची शिकवण दिली त्यात जमीन-अस्मानीचे अंतर आहे.
राज ठाकरेंना केवळ ‘राज’कारण करायचे आहे. कालच्या सभेत त्यांनी अनेक प्रासंगिक मुद्यांना बगल देत उगाच नसते विषय उपटून काढले. जसे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांना शह देण्यासाठीचा ठोबळे या पोलीस अधिकार्‍यांचा मुद्दा.

राज ठाकरेंनी आजपर्यंत जितक्या विषयात लक्ष घातले आहे त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठोस कृती कार्यक्रम दिला आहे. जसे ‘भैय्या हटाव आंदोलन’, ‘टोलविरोधी आंदोलन’; पण कालच्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताच कृती कार्यक्रम दिलेला नाही. त्यांनी आपल्या भाषणात बांग्लादेशी मुसलमानांचा उल्लेख केला, पण त्यांना हुडकून बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रयत्न करावेसे वाटत नाही.

राजकारणाचा समाजकारण व राष्ट्रकारणाशी संबंध असणे गरजेचे आहे. राज यांची कालची सभा नुसते चर्चेचे गुर्‍हाळ उत्पन्न करील. या सभेचा ना आसामातील दंगलीशी काही संबंध, ना त्यानंतर देशभरात उत्पन्न झालेल्या पूर्वांचलकासीयांच्या सुरक्षेशी. काठीला काठीने उत्तर देण्याची भाषा करणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेकडे पूर्वांचलातील बांधवांच्या समस्येसाठी काही उत्तर नाही. राज स्वत:ला महाराष्ट्राचे नेते म्हणवतात, पण राज ठाकरे यांची ही कृती महाराष्ट्राला लाजवणारी आहे. कारण याआधीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी, समाजधुरीणांनी अखिल राष्ट्राच्या कल्याणाची मांडणी केली आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अनिल काकोडकरपर्यंतच्या अखिल भारतीय कार्याची जाणं राज यांनी ठेवायला हवी होती.

Friday 27 April 2012

भ्रष्टाचाराची जननी कॉंग्रेसला ‘बंगारू’ प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही


तहलका प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना आज सीबीआय कोर्टाने दोषी घोषित केले. यावरून आज दिवसभर सगळी प्रसारमाध्यमे भाजपवर आगपाखड करत आहेत. गेल्या काही काळापासून कॉंग्रेसला वेठीस धरणार्‍या भाजप पक्षाचे माजी अध्यक्षच कसे भ्रष्टाचारी आहेत, हे हिरहिरीने सबसे तेजपद्धतीने मांडण्याची चढोओढ सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी पत्रकारांनासमोर फिल्मी डायलॉग मारून गेले की, ‘‘जिन के घर शिशे के होते है, वोह दुसरे के घर पे मिट्टी और पत्थर नही मारा करते|’’ तिवारींची डायलॉग डिलिव्हरी पाहून सिने अभिनेते राजकुमार आणि दिलीप कुमारची आठवण होते.

माजी भाजपाध्यक्ष बंगारू लक्ष्मण भ्रष्ट असतीलही, त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल न्यायालय योग्य ती शिक्षा नक्कीच करेल. पण येथे मुख्य प्रश्‍न हा उपस्थित होतो की, गेल्या चार दिवसांपासून ज्या महत्त्वाच्या विषयांवर माध्यमे चर्चा घडवून आणत होते, ते विषय लगेल मार्गी लागले का? आठवड्याच्या सुरुवातीलाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी हे सेक्स स्कँडलमध्ये अडकून त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. बुधवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी व विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावांची चर्चा असलेले बोफोर्स प्रकरण पुन्हा चर्चेत आले. संसदेत भाजप व डाव्यांसह सर्वच विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला धारेवर धरले.

इतक्या महत्त्वाच्या विषयांवर सुरू असलेल्या चर्चांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरिता कॉंग्रेसचे काल सचिन तेंडुलकर व सिने अभिनेत्री रेखा हिला राज्यसभेवर घेऊ केले. माध्यमांनी लगेच चर्चेचा विषय बदलत 'सचिनने राजकारणात जावे की नाही?', इथपासून ते 'रेखा आणि जया एकाच घरात, म्हणजे जे अमिताभ करू शकला नाही, ते कॉंग्रेसने करून दाखवले'; अशा प्रकारची वाचाळ बडबड घडवून आणली.

बंगारू लक्ष्मण यांच्यावर लाच घेतल्यालाचा आरोप आहे, पण तो आकडा किती आहे, तर केवळ एक लाख रुपये. एक लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी भाजपला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉंग्रेसने बोफोर्स घोटाळ्यापासून ते कोळसा घोटाळ्यापर्यंत कोटींच्या कोटी किती खाल्ले आहेत, याची नुसती बेरीज करून पाहावी.

कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेले उदाहरणार्थ काही घोटाळे

- सन १९४८ साली पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात जीप घोटाळा (सुमारे रक्कम ८० कोटी)
- सन १९५८ मुंध्रा घोटाळा (सुमारे रक्कम १.२ कोटी)
- सन १९७१ सालचा नगरवाल घोटाळा (रक्कम सुमारे ६० लाख)
- महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या नावाची चर्चा असलेला १९८१ सालचा सिमेंट घोटाळा (रक्कम सुमारे ३० कोटी)
- १९८७ सालापासून आजपर्यंत ज्याची चर्चा सुरू आहे आणि ज्यात प्रत्यक्ष तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घेतले जाते, तो बोफोर्स घोटाळा
- कॉंग्रेसचे माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना ज्यात प्रत्यक्ष शिक्षा झाली तो १९९६ सालचा दूरसंचार घोटाळा
यासह सध्या चर्चेत असलेले युपीएचे प्रत्यक्ष मंत्री तुरुंगात असलेला बहुचर्चित २-जी घोटाळा व कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा हे तर सर्वपरिचित आहेत.

भारतीय जनता पक्षही बंगारू प्रकरणात लगेल बचावाच्या पवित्र्यात जाताना दिसतो. विरोधक सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को!या पवित्र्यात असतात आणि तुम्ही मात्र सोवळ अंगावर घेऊन चिडीचुप होता...

भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपाने नेहमी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसून आली आहे, मग ते हवाला कांडअसोत की कर्नाटकचे खाण प्रकरणअसो. दक्षिणेत कमळ फुलवून दाखवण्याची किमया करणार्‍या येड्डियुरप्पांना भाजपने मुख्यमंत्रीपदावरून दूर केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपला बोल लावण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही.

या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका येते ती माध्यमांची. माध्यमांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणार्‍या अण्णा हजारेंना मोठे केले. त्यांना राष्ट्रीय नेता केले. मग हिच माध्यमे सर्व भ्रष्टाचाराची जननी असणार्‍या कॉंग्रेसला अडचणीत आणण्यापेक्षा तिला तारणहार म्हणून का धाव घेतात?

Thursday 19 April 2012

बेकायदा दारुविक्रीला विरोध करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला

बेकायदा दारुविक्रीला विरोध करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला


मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी: बेकायदा गावठी दारुधंद्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देऊन ते धंदे बंद करणाऱ्या रा. स्व. संघाच्या एका कार्यकर्त्यांवर आज दारुगुत्त्याच्या मालकाने प्राणघातक हल्ला केला. हा कार्यकर्ता सुदैवाने वाचला; मात्र या सुराहल्ल्यात त्याच्या खांद्यावर तसेच पंजावर खोल जखमा झाल्या आहेत. गोरेगाव (पूर्व) येथील उडपी हॉटेलनजीकच्या नौपाडा या वस्तीत अनेक वर्षांपासून गावठी दारूचे बेकायदा धंदे चालत होते. दारू विकणाऱ्यांची दादागिरी तसेच ती घेण्यासाठी येणाऱ्यांचे असभ्य वर्तन यामुळे संध्याकाळनंतर मुली व स्त्रियांना बाहेर पडणेही मुश्किल होत असे. वस्तीतील अनेक लोकही दारू पित असल्याने संसाराची वाताहत होण्याचेही प्रकार घडले आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे वस्तीतील तरुण मंडळींनी हे गुत्ते बंद पाडण्याचा निर्धार केला. दीपक मयेकर, शैलेश व दिनेश राजपुत हे भाऊ, निलेश शिगवण, जगदीश तळवडे आदी संघस्वयंसेवक तसेच दीपक रामाणे, राजन कदम, श्रीमती पूनम मोरे आदी मंडळींनी पोलिसांना निवेदन देऊन हे गुत्ते बंद करण्याची विनंती केली. वस्तीनेही त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. अनेक महिने ही प्रक्रिया सुरू होती. या काळात अनेक कार्यकर्त्यांवर गुत्तेदारांनी हल्ले केले, त्यांना धमक्या दिल्या. मात्र या मंडळींनी या दहशतीला दाद न देता आपला लढा सुरूच ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांना पोलिसांनी सहकार्य दिल्याने अखेर हे गुत्ते पूर्णपणे बंद झाले. तसेच वातावरणही सुधारले. ते तसेच राहावे यासाठी पोलिसांनीही गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. वनराई पोलीस ठाण्याच्या श्रीपाद गुंजकर, अरविंद माने, खांदवे आदी अधिकाऱ्यांनी त्यात पुढाकार घेतला होता.

या प्रकारानंतर दारुविक्री पूर्ण बंद झाली होती. परंतु गुत्तेदार हेमंत देसाई याने मात्र याचा राग मनात ठेवला होता. रविवारी सायंकाळी वस्तीतील एकाचे निधन झाले. त्याच्या अन्त्यसंस्कारांसाठी रात्री १२ च्या सुमारास जोगेश्वरीच्या प्रतापनगर स्मशानभूमीत हे सगळे कार्यकर्ते तसेच हेमंत देसाईसुद्धा गेला होता. त्याने एक मोठा सुरा जवळ बाळगला होता. अन्त्यविधी सुरू असतानाच त्याने शैलेश राजपुत याच्यावर मागून वार केला. शैलेशच्या ते लक्षात येताच त्याने तो चुकविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुऱ्याचा वार त्याच्या उजव्या खांद्यावर लागला. हेमंतने पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु शैलेशने डाव्या हाताने सुरा धरून ठेवल्याने त्याचा पंजा फाटला. दरम्यान, इतर मंडळींनी धाव घेऊन शैलेशला वाचविले. हेमंतला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यातही त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार केले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Friday 13 April 2012

बाबासाहेब सर्व समाजासाठी ‘आपले’ व्हावेत!


माझ्या मनात नेहमी दरिद्री, गरीब वर्ग व दलित समाजाबद्दल ममत्व असते. हे माझ्या मित्रपरिवारात जवळजवळ सगळ्यांना ठाऊक आहे. माझा ब्राह्मण समाजाबद्दल आकस नाही, पण समाजाची ही स्थिती होण्यात सनातनी ब्राह्मण वर्गाचा मोठा वाटा आहे, हे माझे मत आहे. माझी ही मते सर्वज्ञात असल्यामुळे काल माझा एक मित्र सहज हसता हसता म्हणाला की, ‘‘उद्या तुमच्याबाबांची जयंती आहे ना?’’ त्याच्या म्हणण्यातील तुमच्याहे आपल्या समाजाची खरी मन:स्थिती सांगून जाते. आजही सर्व समाजाने बाबासाहेबांना आपलेसे मानले नाही, हेच यातून ध्वनीत होते.

बाबासाहेबांनी गावाकुसाबाहेरच्या लोकांना समाजात मान मिळवून देण्यासाठी आयुष्य खर्ची केले. त्यामुळे हा समाज आत्मविश्‍वासाने उभा राहू शकला. समाजाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट होऊ शकला. या समाजासाठी जर कोणी अशाप्रकारचे कार्य केले नसते, तर कदाचित आज या समाजातसुद्धा नक्षलवादासारखी एखादी दहशतवादी चळवळ उभी राहिली असती आणि आमच्या नक्षलवाद्यांप्रमाणे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध उभा ठाकला असता. दलित, हरिजन आदी केवळ अशी नावे देऊन ही जनता समाजाच्या मुख्य प्रवाहात येणं शक्य नव्हते. त्यासाठी बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण जीवनाचा यज्ञ करावा लागला आहे.

या दृष्टिकोनातून पाहिल्यावर कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या कार्याचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होईल. दुर्दैवाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारी पातळीवर सन्मान फक्त कॉंग्रेसशी एकनिष्ठता दाखवणार्‍यांना प्राप्त झाला. त्यात स्वा. सावरकर व डॉ. आंबेडकर हे तर कुठेच मोडले जात नाहीत. त्यामुळे सरकारी पातळीवर या व इतर महनीयांना राष्ट्रीय सन्मान मिळण्याची शक्यताच नाही व आपल्या दृष्टीने तर कॅलेंडरवर जयंती व पुण्यतिथीची नोंद असते, या व्यतिरिक्त यांचे काहीच मोल नाही. या वर्षी तर रविवारला लागून आल्यामुळे आंबेडकर जयंती म्हणजे मोठा विकेंड (साप्ताहिक सुटी) अशीच सगळ्यांची भावना झाली आहे.

समाजाचा हा दृष्टीकोन बदलला जाण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा आपला समाज हा राष्ट्रीय समाजम्हणून कधी एकसंध होण्याची शक्यताच नाही.