Thursday 5 May 2011

तू प्रकाश हो !

तू प्रकाश हो !
अंधाराला भिऊ नको.


तो कितीही दाट असला,
तो कितीही भयाण असला,
तरी....
तरी तुझ अस्तित्व म्हणजेच त्याचा अंत आहे.
तू प्रकाश हो !


तू भेदक आहेस,
तू तिष्ण आहेस,
तू मार्मिक आहेस....
तू प्रकाश हो !


जीवन म्हणजे जरी
संकटांचं, प्रश्नांचं,
अंधाराचं गाठोडं....
या गाठोड्याला राख करणारं तूच...
तूच ते तत्त्व आहेस !
तू प्रकाश हो !


बाहेरील ऊर्जा क्षणीक असेल,
तू खरा सूर्य हो !
तू प्रकाश हो !


आणि तू प्रकाश होण्यास यशस्वी झालास
की तिथेच थांबू नकोस,
दुसर्‍यांनाही प्रकाशमान कर !
हाच खरा दीप संदेश !
तू प्रकाश हो !


                                                  - शैलेश

(ही कविता मी २००९ साली ’सा. विवेक’च्या दीपावली मीलनात सादर करण्यासाठी तयार केली होती)

Wednesday 4 May 2011

संघ परिवार???



           डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाचं संघटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना केली. पुढे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनीही ‘‘संघ हे समाजातील एक संघटन नसून ते संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आहे’’ असे प्रतिपादन केले होते. आजची प्रत्यक्ष स्थिती मात्र अगदी विपरीत दिसते आहे. संघ हे समाजाचे संघटन न होता, समाजातील एक संघटन झाल्यासारखे वाटत आहे, म्हणजेच संघ संस्थारूप झाला आहे.
       
         हल्ली सगळीकडे ‘संघ परिवार’ हा शब्द ऐकायला मिळतो. ‘संघ परिवार’ म्हणजे संघाच्या माध्यमातून किंवा ज्या संस्थांमध्ये संघाचे स्वयंसेवक/कार्यकर्ते पदाधिकारी आहेत किंवा संघविचारांतून चालणार्‍या संस्था/संघटना असे साधारण स्पष्टिकरण दिले जाते. हो.वे. शेषाद्रीजींनी लिहिलेल्या ‘उगवे संघ पहाट’ या पुस्तकातही संघाच्या या संस्थाजीवनाचा गोषवारा देण्यात आलेला आहे.
       
          संघ स्वयंसेवक अगदी स्वाभाविक विचार करतात की ‘आपली शाळा’, ‘आपली संस्था’, ‘आपली बँक’, ‘आपली पार्टी’, ‘आपला पेपर’, ‘आपला कार्यकर्ता’..... इथे आपल्याला ‘आपले’ म्हणजे काय अपेक्षित असते? संपूर्ण हिंदू समाज आपला नाही का? जर संपूर्ण हिंदू समाज आपला असेल, तर त्यातील ठराविक विचारांच्याच गोष्टींना आपण आपले का म्हणावे? समाजवाद्यांनीही बर्‍याच शाळा काढल्या. तिथेही चांगले शिक्षण दिले जाते. तर त्या शाळा आपल्या नाहीत का? निदान कॉन्व्हेन्ट शाळांपेक्षा तरी त्या बर्‍या ना! देशात सर्वात मोठा राजकीय वारसा असलेली कॉंग्रेस आपली होऊ शकत नाही का? शिवसेनेसारखा तोंडदेखले का होईना, पण हिंदुत्वाची कास धरणारा राजकीय पक्ष आपला नाही का? समाजात बरेच जण सामाजिक, सांस्कृतिक, सेवा अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत. निस्वार्थ बुद्धीने, प्रामाणिकपणे करत आहेत. ते का आपले नाहीत?

          संघाव्यतिरिक्त इतर सर्व झूट आहे. सगळ्याबद्दल आपल्या मनात साक्षंकता का असते? आपल्या अशा एकांगी विचार करण्याने संघकार्यकर्त्यांमध्ये अभिनिवेश निर्माण होऊ लागला आहे. अशा प्रकारचा अभिनिवेश असणे हा दोषच आहे. याचा पुढचा परिणाम म्हणजे संघविचारांतून सुरू झालेल्या संस्थांमध्येसुद्धा संघच बरोबर बाकीच्या त्यामानाने कमी, अशी भावना हळूहळू आपल्यात येऊ लागते. तो विद्यार्थी परिषदवाला आहे ना म्हणून असा, ते भाजपवाले सगळे असेच!! इत्यादी इत्यादी... आधी संघ म्हणून स्वत:ला समाजापासून दूर करण्याची विकृती आणि ह्याच विकृतीचा परिपाक म्हणजे ‘संघ परिवारा’तसुद्धा आपले-परके करण्याचा मानस! संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्याचे डॉक्टरांचे स्वप्न नव्हे तर त्यांनी आपल्याला दिशादर्शन करून दिलेला मार्ग आपल्या या अंतर्गत विकृतीमुळे आपण चुकलो आहोत का? याची खरंच आज विचार करण्याची गरज आहे.

             सध्या देशात ज्या प्रकारची स्थिती आहे, त्यात देश मोठ्या आशेने संघाकडे बघतो आहे, पण संघाची रचना आपली संघटनात्मक बांधणी करण्यातच लागली आहे. आणीबाणीपूर्व काळात अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली असता बाळासाहेब देवरसांनी संघाची सारी शक्ती जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामागे लावली. याचा परिणाम म्हणून संघावर बंदी येऊ शकेल, संघाच्या शाखा बंद होतील, संघ शिक्षा वर्ग होणार नाहीत या सार्‍याचा विचार बाळासाहेबांनी केला नसेल का? पण समाजासाठी, राष्ट्रासाठी आपली ही आपण आहोत, केवळ ठराविक कार्यपद्धतीसाठी नाही हाच विचार बाळासाहेबांनी केला असावा. म्हणूनच त्यांनी संघाला दुसर्‍या अग्निपरीक्षेत लोटले.



अयोध्येपुरते मर्यादित असलेले ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलन’ राष्ट्रव्यापी करण्याचे श्रेय संघाला जाते. देशात विशाल हिंदू जागरण संघाने यानिमित्ताने केले. पण १९९२ कुठे गेली ही लाट? संघटनात्मकरीत्या पुढे का चालले नाही हे आंदोलन?

              आज निरनिराळ्या क्षेत्रात संघविचारांच्या संस्था/संघटना आहेत, पण निरनिराळ्या संस्था/संघटनांमध्ये संघाचे स्वयंसेवक/कार्यकर्ते का नाहीत? हा विचार केला पाहिजे. समग्र हिंदू समाजाचे संघटन करायला निघालेल्या संघाकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. केवळ संघटनात्मक बांधणीत संघ गुरफटून राहिला तर या कसोटीवर संघ उतरू शकेल का हा प्रश्‍न आहे. संघात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या आहेत आणि अनेक वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांनाही आता प्रश्‍न पडू लागले आहेत. त्यामुळे आता पूनर्विचाराची आवश्यकता आहे, असे वाटते.

- शैलेश राजपूत