Friday 28 December 2012

तरच रोखले जाऊ शकतात बलात्कार!


काही वर्षांपूर्वी संघाची शाखा कार्यवाह अशी जबाबदारी होती. बालांची शाखा होती आमची. बाल शाखा म्हणजे अगदी पहिलीत जाणार्‍या मुलांपासून मुलं यायची. तेव्हाचा एक किस्सा आठवतोय.

शाखा सुटल्यावर सगळ्या बालांसोबत गप्पा, मस्ती करत आम्ही घराकडे परतत होतो. वाटेत दोन मुली घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या आमच्याकडे आल्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘काही मुलं सायकलवरून फिरत आहेत. अंधारात मुली एकट्या दिसल्या की त्यांच्या अंगाला हात लावून पळून जातात. प्लिज आम्हाला मदत करा.’’

आम्ही तरुणांनी आमच्या बहिणींना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत सोडलं. त्यानंतर काही दिवस त्या रस्त्यांवर पहारा करणं, अशा गुंडांचा शोध घेण हा आमच्या शाखेचा उपक्रम झालेला.

दिल्लीत काही दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्कार झाला. आज सिंगापूरला रुग्णालयात त्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली आहे. त्या बलात्कारानंतर बरेच तरुण हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले. मीडियाने या निदर्शनांना सर्वतोपरी प्रसिद्धी दिली. त्यांचा त्यातच धंदा आहे, हे जरी खरं असलं तरी अशा गोष्टींना सर्वतोपरी प्रसिद्धी देऊन त्यांनी चांगल्या गोष्टीच्या मागे आम्ही उभे आहोत हेच दाखवून दिलंय, असं माझं मत आहे. प्रसिद्धीच्या झोतात अनेक चुकीच्या गोष्टीही घडल्याच! पण त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही.

इथे मुद्दा हा येतो की आपले तरुण निदर्शन करायला रस्त्यावर उतरू लागले आहेत. या निदर्शनांच्या दरम्यान दिल्ली किती असुरक्षित आहे याचीसुद्धा सवंग चर्चा झाली. पुढे ही चर्चा दिल्लीच असुरक्षित नाही, तर सारा देश स्त्रियांच्या दृष्टीने किती असुरक्षित आहे, हेही समोर आलं.

एक प्रश्‍न येथे उपस्थित करावासा वाटतो, तरुण निदर्शन करायला बाहेर पडू लागले आहेत, तर संरक्षणाला का नाही? निदर्शन करणं ही प्रतिक्रीया आहे. प्रतिक्रिया देण्यासाठी एखादी दुर्घटना होण्याची वाट का पाहावी?सुरुवातीच्या किस्स्यामध्ये संघाचा उल्लेख केलाय तो संघकामाची जाहिरात करण्यासाठी नाही. अशा प्रकारचा अनुभव समाजात पुरुषार्थ जागृत करणार्‍या अनेक संस्था/संघटनांना आला असेलच. अगदी कॉंग्रेसच्या सेवा दलाला अथवा कम्युनिस्टांनासुद्धा. जसे संघाचे स्वयंसेवक म्हणून आम्ही कृती केली तशीच कृती या संघटनाही करतील, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपले तरुण फक्त निदर्शनांसाठी बाहेर पडत आहेत. अशा विधायक कामांसाठी बाहेर पडून, अशा विधायक कामांना नित्यनेमाने वेळ देऊन बलात्कारासारख्या घटना या समाजात होणारच नाहीत, असा समाज निर्माण करण्यासाठी ते बाहेत पडतील तेव्हाच हे रोखले जाईल. कृपया विचार करा...

Wednesday 22 August 2012

राज ठाकरे यांची सभा : ‘मियॉं की दौड मज्जीद तक’


राज ठाकरे यांची सभा : ‘मियॉं की दौड मज्जीद तक’

- शैलेश राजपूत


कालची राज ठाकरे यांची आझाद मैदानावरील सभा पाहिली की असंच म्हणावसं वाटतं की ‘मियॉं की दौड मज्जीद तक’! आसाम आणि म्यानमार येथे मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी लाखांच्या घरांत मुसलमानांचा जमाव गोळा झाला. तिथे झालेल्या सभेनंतर जमावाने हैदोस घालण्यास सुरुवात केली. पोलीस व माध्यमांना लक्ष्य केले. त्यात महिला पोलिसांववरही अत्याचार झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीकर राज यांचा कालचा मोर्चा आणि सभा होती, पण या सभेत राज यांनी मुजोर झालेल्या या आतंकी प्रकृत्तीवर बोलण्याची हिम्मतच केली नाही. त्यांनी केवळ गृहमंत्री व मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर शरसंधान करून आपली पॉप्युलॅरीटी कायम ठेकली. या वेळी राज केवळ ‘पॉलिटीकली करेक्ट’ होते.

कालच्या मोर्चाच्या विषयात दोन दिवस आधीपासूनच माध्यमांमध्ये ‘राज ठाकरे ‘हिंदुत्व कार्ड’ खेळणार का?’ याबाबत चर्चा होती. मोर्चाच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राज ठाकरें यांना हे प्रश्‍न विचारले गेले. मात्र राज यांनी आपले धोरण आपण उद्याच्या सभेत स्पष्ट करू, असे सांगून सर्वांना तंगवत ठेकले. मनसेच्या आमदारांना काल मोर्चादरम्यान पत्रकारांनी ‘हिंदुत्वा’बाबत प्रश्‍न विचारता ते अंगाकर पाल पडल्यासारखे विषय झटकत होते. त्याचप्रमाणे राज यांनीही सभेत आपण कोणत्याही एका धर्मापुरते नसून आपल्याला ‘महाराष्ट्र धर्म’ कळतो, असे म्हणाले. राज यांचा महाराष्ट्र धर्म आणि समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ‘महाराष्ट्र धर्मा’ची शिकवण दिली त्यात जमीन-अस्मानीचे अंतर आहे.
राज ठाकरेंना केवळ ‘राज’कारण करायचे आहे. कालच्या सभेत त्यांनी अनेक प्रासंगिक मुद्यांना बगल देत उगाच नसते विषय उपटून काढले. जसे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांना शह देण्यासाठीचा ठोबळे या पोलीस अधिकार्‍यांचा मुद्दा.

राज ठाकरेंनी आजपर्यंत जितक्या विषयात लक्ष घातले आहे त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठोस कृती कार्यक्रम दिला आहे. जसे ‘भैय्या हटाव आंदोलन’, ‘टोलविरोधी आंदोलन’; पण कालच्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताच कृती कार्यक्रम दिलेला नाही. त्यांनी आपल्या भाषणात बांग्लादेशी मुसलमानांचा उल्लेख केला, पण त्यांना हुडकून बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रयत्न करावेसे वाटत नाही.

राजकारणाचा समाजकारण व राष्ट्रकारणाशी संबंध असणे गरजेचे आहे. राज यांची कालची सभा नुसते चर्चेचे गुर्‍हाळ उत्पन्न करील. या सभेचा ना आसामातील दंगलीशी काही संबंध, ना त्यानंतर देशभरात उत्पन्न झालेल्या पूर्वांचलकासीयांच्या सुरक्षेशी. काठीला काठीने उत्तर देण्याची भाषा करणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेकडे पूर्वांचलातील बांधवांच्या समस्येसाठी काही उत्तर नाही. राज स्वत:ला महाराष्ट्राचे नेते म्हणवतात, पण राज ठाकरे यांची ही कृती महाराष्ट्राला लाजवणारी आहे. कारण याआधीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी, समाजधुरीणांनी अखिल राष्ट्राच्या कल्याणाची मांडणी केली आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अनिल काकोडकरपर्यंतच्या अखिल भारतीय कार्याची जाणं राज यांनी ठेवायला हवी होती.

Friday 27 April 2012

भ्रष्टाचाराची जननी कॉंग्रेसला ‘बंगारू’ प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही


तहलका प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना आज सीबीआय कोर्टाने दोषी घोषित केले. यावरून आज दिवसभर सगळी प्रसारमाध्यमे भाजपवर आगपाखड करत आहेत. गेल्या काही काळापासून कॉंग्रेसला वेठीस धरणार्‍या भाजप पक्षाचे माजी अध्यक्षच कसे भ्रष्टाचारी आहेत, हे हिरहिरीने सबसे तेजपद्धतीने मांडण्याची चढोओढ सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी पत्रकारांनासमोर फिल्मी डायलॉग मारून गेले की, ‘‘जिन के घर शिशे के होते है, वोह दुसरे के घर पे मिट्टी और पत्थर नही मारा करते|’’ तिवारींची डायलॉग डिलिव्हरी पाहून सिने अभिनेते राजकुमार आणि दिलीप कुमारची आठवण होते.

माजी भाजपाध्यक्ष बंगारू लक्ष्मण भ्रष्ट असतीलही, त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल न्यायालय योग्य ती शिक्षा नक्कीच करेल. पण येथे मुख्य प्रश्‍न हा उपस्थित होतो की, गेल्या चार दिवसांपासून ज्या महत्त्वाच्या विषयांवर माध्यमे चर्चा घडवून आणत होते, ते विषय लगेल मार्गी लागले का? आठवड्याच्या सुरुवातीलाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी हे सेक्स स्कँडलमध्ये अडकून त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. बुधवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी व विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावांची चर्चा असलेले बोफोर्स प्रकरण पुन्हा चर्चेत आले. संसदेत भाजप व डाव्यांसह सर्वच विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला धारेवर धरले.

इतक्या महत्त्वाच्या विषयांवर सुरू असलेल्या चर्चांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरिता कॉंग्रेसचे काल सचिन तेंडुलकर व सिने अभिनेत्री रेखा हिला राज्यसभेवर घेऊ केले. माध्यमांनी लगेच चर्चेचा विषय बदलत 'सचिनने राजकारणात जावे की नाही?', इथपासून ते 'रेखा आणि जया एकाच घरात, म्हणजे जे अमिताभ करू शकला नाही, ते कॉंग्रेसने करून दाखवले'; अशा प्रकारची वाचाळ बडबड घडवून आणली.

बंगारू लक्ष्मण यांच्यावर लाच घेतल्यालाचा आरोप आहे, पण तो आकडा किती आहे, तर केवळ एक लाख रुपये. एक लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी भाजपला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉंग्रेसने बोफोर्स घोटाळ्यापासून ते कोळसा घोटाळ्यापर्यंत कोटींच्या कोटी किती खाल्ले आहेत, याची नुसती बेरीज करून पाहावी.

कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेले उदाहरणार्थ काही घोटाळे

- सन १९४८ साली पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात जीप घोटाळा (सुमारे रक्कम ८० कोटी)
- सन १९५८ मुंध्रा घोटाळा (सुमारे रक्कम १.२ कोटी)
- सन १९७१ सालचा नगरवाल घोटाळा (रक्कम सुमारे ६० लाख)
- महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या नावाची चर्चा असलेला १९८१ सालचा सिमेंट घोटाळा (रक्कम सुमारे ३० कोटी)
- १९८७ सालापासून आजपर्यंत ज्याची चर्चा सुरू आहे आणि ज्यात प्रत्यक्ष तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घेतले जाते, तो बोफोर्स घोटाळा
- कॉंग्रेसचे माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना ज्यात प्रत्यक्ष शिक्षा झाली तो १९९६ सालचा दूरसंचार घोटाळा
यासह सध्या चर्चेत असलेले युपीएचे प्रत्यक्ष मंत्री तुरुंगात असलेला बहुचर्चित २-जी घोटाळा व कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा हे तर सर्वपरिचित आहेत.

भारतीय जनता पक्षही बंगारू प्रकरणात लगेल बचावाच्या पवित्र्यात जाताना दिसतो. विरोधक सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को!या पवित्र्यात असतात आणि तुम्ही मात्र सोवळ अंगावर घेऊन चिडीचुप होता...

भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपाने नेहमी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसून आली आहे, मग ते हवाला कांडअसोत की कर्नाटकचे खाण प्रकरणअसो. दक्षिणेत कमळ फुलवून दाखवण्याची किमया करणार्‍या येड्डियुरप्पांना भाजपने मुख्यमंत्रीपदावरून दूर केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपला बोल लावण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही.

या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका येते ती माध्यमांची. माध्यमांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणार्‍या अण्णा हजारेंना मोठे केले. त्यांना राष्ट्रीय नेता केले. मग हिच माध्यमे सर्व भ्रष्टाचाराची जननी असणार्‍या कॉंग्रेसला अडचणीत आणण्यापेक्षा तिला तारणहार म्हणून का धाव घेतात?

Thursday 19 April 2012

बेकायदा दारुविक्रीला विरोध करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला

बेकायदा दारुविक्रीला विरोध करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला


मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी: बेकायदा गावठी दारुधंद्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देऊन ते धंदे बंद करणाऱ्या रा. स्व. संघाच्या एका कार्यकर्त्यांवर आज दारुगुत्त्याच्या मालकाने प्राणघातक हल्ला केला. हा कार्यकर्ता सुदैवाने वाचला; मात्र या सुराहल्ल्यात त्याच्या खांद्यावर तसेच पंजावर खोल जखमा झाल्या आहेत. गोरेगाव (पूर्व) येथील उडपी हॉटेलनजीकच्या नौपाडा या वस्तीत अनेक वर्षांपासून गावठी दारूचे बेकायदा धंदे चालत होते. दारू विकणाऱ्यांची दादागिरी तसेच ती घेण्यासाठी येणाऱ्यांचे असभ्य वर्तन यामुळे संध्याकाळनंतर मुली व स्त्रियांना बाहेर पडणेही मुश्किल होत असे. वस्तीतील अनेक लोकही दारू पित असल्याने संसाराची वाताहत होण्याचेही प्रकार घडले आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे वस्तीतील तरुण मंडळींनी हे गुत्ते बंद पाडण्याचा निर्धार केला. दीपक मयेकर, शैलेश व दिनेश राजपुत हे भाऊ, निलेश शिगवण, जगदीश तळवडे आदी संघस्वयंसेवक तसेच दीपक रामाणे, राजन कदम, श्रीमती पूनम मोरे आदी मंडळींनी पोलिसांना निवेदन देऊन हे गुत्ते बंद करण्याची विनंती केली. वस्तीनेही त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. अनेक महिने ही प्रक्रिया सुरू होती. या काळात अनेक कार्यकर्त्यांवर गुत्तेदारांनी हल्ले केले, त्यांना धमक्या दिल्या. मात्र या मंडळींनी या दहशतीला दाद न देता आपला लढा सुरूच ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांना पोलिसांनी सहकार्य दिल्याने अखेर हे गुत्ते पूर्णपणे बंद झाले. तसेच वातावरणही सुधारले. ते तसेच राहावे यासाठी पोलिसांनीही गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. वनराई पोलीस ठाण्याच्या श्रीपाद गुंजकर, अरविंद माने, खांदवे आदी अधिकाऱ्यांनी त्यात पुढाकार घेतला होता.

या प्रकारानंतर दारुविक्री पूर्ण बंद झाली होती. परंतु गुत्तेदार हेमंत देसाई याने मात्र याचा राग मनात ठेवला होता. रविवारी सायंकाळी वस्तीतील एकाचे निधन झाले. त्याच्या अन्त्यसंस्कारांसाठी रात्री १२ च्या सुमारास जोगेश्वरीच्या प्रतापनगर स्मशानभूमीत हे सगळे कार्यकर्ते तसेच हेमंत देसाईसुद्धा गेला होता. त्याने एक मोठा सुरा जवळ बाळगला होता. अन्त्यविधी सुरू असतानाच त्याने शैलेश राजपुत याच्यावर मागून वार केला. शैलेशच्या ते लक्षात येताच त्याने तो चुकविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुऱ्याचा वार त्याच्या उजव्या खांद्यावर लागला. हेमंतने पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु शैलेशने डाव्या हाताने सुरा धरून ठेवल्याने त्याचा पंजा फाटला. दरम्यान, इतर मंडळींनी धाव घेऊन शैलेशला वाचविले. हेमंतला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यातही त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार केले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Friday 13 April 2012

बाबासाहेब सर्व समाजासाठी ‘आपले’ व्हावेत!


माझ्या मनात नेहमी दरिद्री, गरीब वर्ग व दलित समाजाबद्दल ममत्व असते. हे माझ्या मित्रपरिवारात जवळजवळ सगळ्यांना ठाऊक आहे. माझा ब्राह्मण समाजाबद्दल आकस नाही, पण समाजाची ही स्थिती होण्यात सनातनी ब्राह्मण वर्गाचा मोठा वाटा आहे, हे माझे मत आहे. माझी ही मते सर्वज्ञात असल्यामुळे काल माझा एक मित्र सहज हसता हसता म्हणाला की, ‘‘उद्या तुमच्याबाबांची जयंती आहे ना?’’ त्याच्या म्हणण्यातील तुमच्याहे आपल्या समाजाची खरी मन:स्थिती सांगून जाते. आजही सर्व समाजाने बाबासाहेबांना आपलेसे मानले नाही, हेच यातून ध्वनीत होते.

बाबासाहेबांनी गावाकुसाबाहेरच्या लोकांना समाजात मान मिळवून देण्यासाठी आयुष्य खर्ची केले. त्यामुळे हा समाज आत्मविश्‍वासाने उभा राहू शकला. समाजाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट होऊ शकला. या समाजासाठी जर कोणी अशाप्रकारचे कार्य केले नसते, तर कदाचित आज या समाजातसुद्धा नक्षलवादासारखी एखादी दहशतवादी चळवळ उभी राहिली असती आणि आमच्या नक्षलवाद्यांप्रमाणे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध उभा ठाकला असता. दलित, हरिजन आदी केवळ अशी नावे देऊन ही जनता समाजाच्या मुख्य प्रवाहात येणं शक्य नव्हते. त्यासाठी बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण जीवनाचा यज्ञ करावा लागला आहे.

या दृष्टिकोनातून पाहिल्यावर कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या कार्याचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होईल. दुर्दैवाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारी पातळीवर सन्मान फक्त कॉंग्रेसशी एकनिष्ठता दाखवणार्‍यांना प्राप्त झाला. त्यात स्वा. सावरकर व डॉ. आंबेडकर हे तर कुठेच मोडले जात नाहीत. त्यामुळे सरकारी पातळीवर या व इतर महनीयांना राष्ट्रीय सन्मान मिळण्याची शक्यताच नाही व आपल्या दृष्टीने तर कॅलेंडरवर जयंती व पुण्यतिथीची नोंद असते, या व्यतिरिक्त यांचे काहीच मोल नाही. या वर्षी तर रविवारला लागून आल्यामुळे आंबेडकर जयंती म्हणजे मोठा विकेंड (साप्ताहिक सुटी) अशीच सगळ्यांची भावना झाली आहे.

समाजाचा हा दृष्टीकोन बदलला जाण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा आपला समाज हा राष्ट्रीय समाजम्हणून कधी एकसंध होण्याची शक्यताच नाही.

Friday 29 July 2011

‘कारगिल विजया’नंतरचे युद्ध


जुलै २६ ला काही शहरांमध्ये बारावा ‘कारगिल विजय दिवस’ साजरा झाला. युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. कारगिल युद्धात तुलनेने ती जास्तच झाली. अनेक जवानांनी प्राणार्पण करून उत्तर टोक भारतात शाबूत ठेवलं. त्यामुळे या जवानांच्या कुटुबियांचे कारुण्य या वेळी व्यक्त होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम झाले. आतापर्यंत हे कार्यक्रम सरकारी आणि सैनिकी पातळीवर होत होते. पण या वर्षी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, वडोदरा, जयपूर, भोपाळ, बंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये तरुणांनी या दिवशी कार्यक्रम आयोजित केले. पण जवळजवळ या सगळ्याच ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं आणि त्यासाठी मेणबत्त्या पेटवणं, एवढंच झालं.

त्यामुळे इथे प्रश्‍न उपस्थित करावासा वाटतो की विजय दिवस म्हणजे काय? तो कसा साजरा करतात? आणि अशा मेणबत्त्या लावून किती काळ श्रद्धांजलीच देत राहणार? श्रद्धांजली देणार्‍यांच्या भावनांची अवहेलना करू इच्छित नाही, पण अशी आपल्याच लोकांची प्रेत आपण किती काळ पाहत राहणार? कारगिल युद्धात मारल्या गेलेल्या एकातरी भारतीय सैनिकाची काही चूक होती का? हे युद्ध आपल्यावर थोपवलं गेलं आणि त्यात आपल्या लोकांचं अनाहूत रक्त सांडलं. विजय दिवशी आपल्याला या सगळ्याची योग्य चिकित्सा करणं गरजेचं वाटत नाही का?

कारगिल युद्धाला एक तप लोटले. काल श्रीनगर येथे कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात माजी सैनिक प्रमुख व्ही. पी. मलिक म्हणाले की, कारगिलसारखे युद्ध पुन्हा होऊ शकते. मलिक हे कारगिल युद्धाच्या वेळी सैन्य प्रमुख होते. त्यांनी येथे म्हटले आहे की, पाकिस्तानातून सतत घुसखोरी सुरू आहे, तसेच हे पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले छद्म युद्ध आहे. याचाच अर्थ पुन्हा केव्हा तरी कारगिलप्रमाणे युद्ध होणार आणि त्याच्या बारा वर्षांनंतर आपण पुन्हा हातात मेणबत्त्या घेऊन आपल्यातील ज्या लोकांचे रक्त सांडले आहे त्यांना सश्रद्ध मनाने आदरांजली देत असणार.

मलिक यांनी ज्या छद्म युद्धाचा येथे उल्लेख केला त्याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कारगिल विजयानंतर म्हणजे २६ जुलै १९९९ नंतर नवी दिल्ली, मुंबई, पुणे, वाराणसी, बंगळुरू, गुवाहाटी अशा देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात बॉम्बस्फोट झाले. देशाचे सर्वोच्च ठिकाण समजल्या जाणार्‍या संसदेवर हल्ला झाला. २६/११ चा मुंबई हल्ला, अक्षरधाम मंदिरावरील हल्ला, या सगळ्या घटना कारगिल विजयानंतरच्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तर दहशतवाद हा रोजचा झाला आहे.

विजय मिळवल्यानंतरही आपण लढतोच आहोत किंवा मरतोच आहोत, हेच म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्यामुळे जर नुसत्या मेणबत्त्या लावण्याची पद्धत तरुणांना अंगवळणी पडली तर हा देश संपेपपर्यंत आपण मेणबत्त्याच लावत राहू.

नुकतेच मुंबईत बॉम्बस्फोट झाले आहेत. त्याने देशापुढील दहशतवादाचे संकट पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दहशतवाद ही जागतिक समस्या म्हटली आहे. अमेरिका, इंग्लंड, इस्राएल व भारत हे राष्ट्रे दहशतवाद्यांची प्रमुख लक्ष्य आहेत. अशा वेळी तरुणांना या छद्म युद्धाचा सामना करण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांनी भारताला लक्ष्य का केले याचीही परखड कारणमिमांसा करणे आता गरजेचे झाले आहे.
दहशतवादाचे अंतरंग

दहशतवाद जरी आंतरराष्ट्रीय समस्या असली तरी भारताच्या/बाबतीत सांगायचे झाले तर त्याचा मूल स्रोत हा पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून पाकिस्तान भारताला आपला क्रमांक एक शत्रू मानतो. त्यामुळे दहशतवादाचा सामना करताना पाकिस्तानबाबत आपल्या मनातील भाबड्या भावनांना तिलांजली देणं सर्वाधिक गरजेचं आहे.

आपल्या दृष्टीने पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी यात अंतर आहे. पण पाकिस्तानच्या दृष्टीने तसे नाही आहे. कारण दोघांच्या कार्यपद्धतीत फरक असला तरी उद्देश एकच आहे. कार्य एकच आहे. यातील सैनिक या घटकाला अधिकृतपणे व दहशतवाद्याच्या अनधिकृतपणे राजाश्रय आहे. हे पाकिस्तानचे धोरण आहे.

पुढे प्रश्‍न येतो दहशतवाद्यांच्या प्रेरणेचा. दहशतवादाची मूळ प्रेरणा ही त्यांचा धर्म म्हणजेच ‘इस्लाम’ आहे. इस्लाममधील ‘जिहाद’सारख्या संकल्पना त्यांचा या मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करतात. अनेक पाश्‍चात्त्य अभ्यायकांनी या मनोवृत्तीचा अभ्यास करून या सगळ्याचा मूल स्रोत इस्लाम असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे ख्रिश्‍चनांना विरोध म्हणून अमेरिका व युरोपीय देशांशी शत्रूत्व, ज्यूंना विरोध म्हणून इस्राएलशी शत्रूत्व; त्याचप्रमाणे हिंदुंना विरोध म्हणून भारताशी शत्रूत्व. आपल्याला सहसा मान्य होणार नसले तरी पाकिस्तानच्या भारतद्वेषाचे मूळ कारण हे धर्म आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही अंगिकारली. तरीही जगाच्या दृष्टीने भारत हा हिंदुंचा देश आहे. त्यामुळे हिंदुंद्वेषापोटी पाक आपल्यावर ही युद्धे लादत आहे. हे वास्तव स्पष्टपणे तरुणांना सांगण्याची आज गरज आहे.

कारगिल विजयानंतरची बारा वर्षे ही युद्धजन्य स्थितीतच गेली, पण दीर्घकालीन विजय मिळवायचा असेल तर शत्रूची खरी ओळख करून घेणे आणि युद्धास सज्ज होणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.
(माझा हा लेख दि. २८ जुलै २०११ रोजीच्या ’मुंबई तरुण भारत’मध्ये प्रकाशित झाला आहे.)

Wednesday 22 June 2011

गोपीनाथांचं काय चुकलं?



‘भारतीय जनता पक्ष‘ म्हणजे मुळचा ‘भारतीय जनसंघ’ याची प्रारंभापासूनची ओळख  'A Party of Difference' आहे आणि आज तो देशातील एक मोठा पक्ष आहे. तसेच गेल्या ६२ वर्षांत कॉंग्रेसला सक्षम पर्याय म्हणून हाच एकमेव पक्ष आहे. म्हणजे देशात लोकशाही व्यवस्था स्थिर ठेवण्यात याचा खूप मोठा वाटा आहे. अन्यथा राज्यव्यवस्थेत कॉंग्रेसची मक्तेदारी झाली असती. कारण गेल्या साठ वर्षांत कॉंग्रेसला पर्याय म्हणून कोणताही पक्ष या खंडप्राय देशात सक्षमपणे उभा राहू शकलेला नाहीय. कॉंग्रेस व भाजपा व्यतिरिक्त जे अन्य चार राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं बस्तान एखाद-दोन राज्यांपेक्षा जास्त बसलेलं नाही.

हे झालं भाजपचं भारतीय राज्यव्यवस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान. सध्या महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गोपीनाथ मुंडे किंवा इतर कोणत्याही भाजप नेत्याबद्दल विचार करताना आपल्याला मूळता ‘भाजप’चा विचार करणं गरजेचं आहे.

गोपीनाथराव हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव कायम चर्चेत आहे. ते मूळचे मराठवाड्यातील असून त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची जाणं आहे. ते अन्य मागासवर्गीय जातीचे आहेत. गोपीनाथरावांचा राजकारणातील उदय आणि कार्यकाळ पाहता एक गोष्ट लक्षात येते ती ही की, गोपीनाथरावांचं ‘पॉलिटिकल करिअर’ हे भाजपव्यतिरिक्त कोणत्याही पक्षात होऊ शकलं नसतं. गोपीनाथ मुंडेंना राष्ट्रवादीत स्थान नाही कारण महाराष्ट्रातील दुसरे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचीच सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गळचेपी होतेय. दोन्ही कॉंग्रेस या ‘मराठा’ जातीचे राजकारण करणार्‍या आहेत. विद्यापीठ नामांतराच्या काळातील शिवसेनेची भूमिकाही ज्ञात आहे. त्यामुळे मुंडेंसारख्या एका ग्रामीण नेत्याला दिल्लीपर्यंत नेऊन बसवण्याची किमया केवळ भाजप करू शकला.

गोपीनाथ मुंडे यांचे कर्तृत्व खरंच ‘प्रचंड‘ असंच म्हणावं लागेल. मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गापर्यंत मर्यादित असलेल्या भाजपाला त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारलं. ऊस, कापूस, शेतीविषयक अनेक विषयांवर रान पेटवलं. ते ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज झाले. शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याला विरोधी बाकावर बसवण्याची किमया त्यांनी महाराष्ट्रात करून दाखवली. युतीच्या शासनकाळात ते गृहमंत्री होते. त्या काळात त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवून दाखवलं. असे मोठे जनाधार असलेले नेते म्हणून मुंडे ओळखले जाऊ लागले.

पण प्रश्‍न असा उपस्थित होतो की सत्ता आली, खूर्ची मिळाली; त्यानंतर मात्र मुंडेंचा आवाज क्षीण का होताना दिसला? ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्‍न हिरीरिने मांडणार्‍या मुंडेंच्या शस्त्राची धार नंतर बोथट का झाली? दरम्यानच्या काळात नितीन गडकरी, विनोद तावडे यांचेही नवे नेतृत्व भाजपामध्ये उदयाला आले. गडकरी विदर्भाचे प्रतिनिधित्व करतात, तर तावडे कोकणाचे. आतापर्यंत महाराष्ट्र म्हणजे मुंडे असे समीकरण होते ते आता बदलू लागले. गडकरी-तावडे व अन्य हे मुंडेंनंतर आलेले. मुंडेंनी त्यांचे मार्गदर्शन करून महाराष्ट्रात भाजपला सक्षमपणे उभे करण्याची गरज होती. महाराष्ट्रात भाजपातील वडीलकीच्या नात्याने ते हे करू शकले असते पण महाराष्ट्रात चित्र उलटे दिसले. मुंडे-गडकरी गटा-गटांत विभागले गेले.

अनेक विषयांत गडकरींनी कठोर भूमिका घेतली होती त्यामुळे गडकरी भाजपमधील तरुण कार्यकर्त्यांचे आदर्श झाले. शिवसेना महाराष्ट्रात भाजपला संघटनात्मक वाढू देत नाही असा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा अनूभव आहे. गडकरींनी सत्तेच्या शुल्लक राजकारणापेक्षा पक्ष संघटनेला महत्त्व दिले. शिवसेनेच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षात त्यांचे स्थान वाढले. कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटू लागले.
२००९च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकांनंतर मुंडे व गडकरी हे दोघंही नेते दिल्लीत गेले. दिल्लीत मुंडेंना मानाचे स्थान मिळाले. राजकारणाचा ३० वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभव असलेल्या नेत्याने दिल्लीत सक्षम राजकारण करण्याची गरज आहे. महागाई, भ्रष्टाचार, शेती, सुरक्षेच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेसला चारही दिशा चित करण्याची गरज आहे. अशावेळी मुंडे मात्र माझ्या माणसाला मुंबई भाजपाचं अध्यक्ष केले नाही, पुणे भाजपाचे अध्यक्ष केले नाही अशा शुल्लक विषयांवर राजकारण करत आहेत. सध्याची देशाची स्थिती पाहता मुंडेंचे हे ‘शुल्लक’ राजकारण निंदनीय आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे भाजप ही  'A Party of Difference' आहे. मुंडेंनी याचे भान ठेवून आपले राजकारण करावे. मुंडेंच्या शुल्लक राजकारणाने भाजपाची ‘कॉंग्रेस’ होतेय का? असा प्रश्‍न पुन्हा उभा राहतोय!