Wednesday 22 June 2011

गोपीनाथांचं काय चुकलं?



‘भारतीय जनता पक्ष‘ म्हणजे मुळचा ‘भारतीय जनसंघ’ याची प्रारंभापासूनची ओळख  'A Party of Difference' आहे आणि आज तो देशातील एक मोठा पक्ष आहे. तसेच गेल्या ६२ वर्षांत कॉंग्रेसला सक्षम पर्याय म्हणून हाच एकमेव पक्ष आहे. म्हणजे देशात लोकशाही व्यवस्था स्थिर ठेवण्यात याचा खूप मोठा वाटा आहे. अन्यथा राज्यव्यवस्थेत कॉंग्रेसची मक्तेदारी झाली असती. कारण गेल्या साठ वर्षांत कॉंग्रेसला पर्याय म्हणून कोणताही पक्ष या खंडप्राय देशात सक्षमपणे उभा राहू शकलेला नाहीय. कॉंग्रेस व भाजपा व्यतिरिक्त जे अन्य चार राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं बस्तान एखाद-दोन राज्यांपेक्षा जास्त बसलेलं नाही.

हे झालं भाजपचं भारतीय राज्यव्यवस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान. सध्या महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गोपीनाथ मुंडे किंवा इतर कोणत्याही भाजप नेत्याबद्दल विचार करताना आपल्याला मूळता ‘भाजप’चा विचार करणं गरजेचं आहे.

गोपीनाथराव हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव कायम चर्चेत आहे. ते मूळचे मराठवाड्यातील असून त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची जाणं आहे. ते अन्य मागासवर्गीय जातीचे आहेत. गोपीनाथरावांचा राजकारणातील उदय आणि कार्यकाळ पाहता एक गोष्ट लक्षात येते ती ही की, गोपीनाथरावांचं ‘पॉलिटिकल करिअर’ हे भाजपव्यतिरिक्त कोणत्याही पक्षात होऊ शकलं नसतं. गोपीनाथ मुंडेंना राष्ट्रवादीत स्थान नाही कारण महाराष्ट्रातील दुसरे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचीच सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गळचेपी होतेय. दोन्ही कॉंग्रेस या ‘मराठा’ जातीचे राजकारण करणार्‍या आहेत. विद्यापीठ नामांतराच्या काळातील शिवसेनेची भूमिकाही ज्ञात आहे. त्यामुळे मुंडेंसारख्या एका ग्रामीण नेत्याला दिल्लीपर्यंत नेऊन बसवण्याची किमया केवळ भाजप करू शकला.

गोपीनाथ मुंडे यांचे कर्तृत्व खरंच ‘प्रचंड‘ असंच म्हणावं लागेल. मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गापर्यंत मर्यादित असलेल्या भाजपाला त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारलं. ऊस, कापूस, शेतीविषयक अनेक विषयांवर रान पेटवलं. ते ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज झाले. शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याला विरोधी बाकावर बसवण्याची किमया त्यांनी महाराष्ट्रात करून दाखवली. युतीच्या शासनकाळात ते गृहमंत्री होते. त्या काळात त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवून दाखवलं. असे मोठे जनाधार असलेले नेते म्हणून मुंडे ओळखले जाऊ लागले.

पण प्रश्‍न असा उपस्थित होतो की सत्ता आली, खूर्ची मिळाली; त्यानंतर मात्र मुंडेंचा आवाज क्षीण का होताना दिसला? ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्‍न हिरीरिने मांडणार्‍या मुंडेंच्या शस्त्राची धार नंतर बोथट का झाली? दरम्यानच्या काळात नितीन गडकरी, विनोद तावडे यांचेही नवे नेतृत्व भाजपामध्ये उदयाला आले. गडकरी विदर्भाचे प्रतिनिधित्व करतात, तर तावडे कोकणाचे. आतापर्यंत महाराष्ट्र म्हणजे मुंडे असे समीकरण होते ते आता बदलू लागले. गडकरी-तावडे व अन्य हे मुंडेंनंतर आलेले. मुंडेंनी त्यांचे मार्गदर्शन करून महाराष्ट्रात भाजपला सक्षमपणे उभे करण्याची गरज होती. महाराष्ट्रात भाजपातील वडीलकीच्या नात्याने ते हे करू शकले असते पण महाराष्ट्रात चित्र उलटे दिसले. मुंडे-गडकरी गटा-गटांत विभागले गेले.

अनेक विषयांत गडकरींनी कठोर भूमिका घेतली होती त्यामुळे गडकरी भाजपमधील तरुण कार्यकर्त्यांचे आदर्श झाले. शिवसेना महाराष्ट्रात भाजपला संघटनात्मक वाढू देत नाही असा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा अनूभव आहे. गडकरींनी सत्तेच्या शुल्लक राजकारणापेक्षा पक्ष संघटनेला महत्त्व दिले. शिवसेनेच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षात त्यांचे स्थान वाढले. कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटू लागले.
२००९च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकांनंतर मुंडे व गडकरी हे दोघंही नेते दिल्लीत गेले. दिल्लीत मुंडेंना मानाचे स्थान मिळाले. राजकारणाचा ३० वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभव असलेल्या नेत्याने दिल्लीत सक्षम राजकारण करण्याची गरज आहे. महागाई, भ्रष्टाचार, शेती, सुरक्षेच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेसला चारही दिशा चित करण्याची गरज आहे. अशावेळी मुंडे मात्र माझ्या माणसाला मुंबई भाजपाचं अध्यक्ष केले नाही, पुणे भाजपाचे अध्यक्ष केले नाही अशा शुल्लक विषयांवर राजकारण करत आहेत. सध्याची देशाची स्थिती पाहता मुंडेंचे हे ‘शुल्लक’ राजकारण निंदनीय आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे भाजप ही  'A Party of Difference' आहे. मुंडेंनी याचे भान ठेवून आपले राजकारण करावे. मुंडेंच्या शुल्लक राजकारणाने भाजपाची ‘कॉंग्रेस’ होतेय का? असा प्रश्‍न पुन्हा उभा राहतोय!

2 comments:

  1. mundhe jya paddhatine party sodun mat vyakt karat hote te yoggy nahvat. pakshat yenyapurvee aapan svayamsevak hoto yach bhan rahil nahi. mul visarlyacha parinam !

    ReplyDelete
  2. munde aale part bhaajpaat.
    he raajkiy lekhn lgech maage pdte.

    ReplyDelete